₹220.00
’द्वंद्व’ या पहिल्याच कथेत विवाहानंतर लगेचच भरल्या घरात पत्नीला एकटी सोडून संपत्तीत वाढ करण्याच्या उद्देशाने व्यापारासाठी पाच वर्षे परदेशी जाणारा धनवान नवरा आणि तेवढ्या कालावधीत नवऱ्याचे रूप घेऊन नववधूसोबत राहाणारे भूत याचे वर्णन आहे. सत्ता, संपत्ती आणि अधिकारामुळे पुरुषांचा पाय घसरू शकतो; त्यांना आवर घालण्यासाठी स्त्रियानांही तसे वागावे असे वाटले तर काय? अशा अर्थाचे घटना-प्रसंग ’न्यारी न्यारी मर्यादा’ या कथेमध्ये आहेत; तर राग, लोभाच्या पलीकडे गेलेला अस्सल विणकर कबीर आणि त्याचा वेगळेपणा जाणून घेण्यासाठी आलेली उत्सुक राजकन्या व राजा यांच्या विलक्षण भेटीत कबीराचे जीवनविषयक तत्त्वज्ञान ’दुसरा कबीर’ कथेत येते. दुनियेतील तमाम स्त्रियांचं फक्त एकच रामायण आहे- पुरुषांच्या हातून फसवलं जाणं आणि आयुष्यभर त्या फसवणुकीचा परिणाम भोगणं, असा संदेश लक्खू ही अनुभवी वेश्या ’काकपंथ’ या कथेतून देते. आपल्या निगराणीने वनमानवाला माणसात आणून, गुराखी (खरे तर राजकुमार!) बनवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बंजारनचे वर्णन ’बिकट प्रश्न’ कथेत आहे. अशाच इतर काही कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. प्रत्येक कथेचे सूत्र थोडेफार वेगळे असले, तरी स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, राग-लोभ, स्पर्धा, असूया यांवर प्रकाश टाकणार्या या कथा पारंपरिक कल्पनांचे अंतरंग उलगडून दाखवतात. गूढ वातावरण आणि कल्पनारम्यता असली तरी या अस्सल कथांमध्ये प्रखर वास्तवाचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य आहे.